नवीन लेखन...

आदित्यराणूबाई

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हा त्या म्हणाल्या, “श्रावणमास येईल, तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहूण जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, “भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या.” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल.” राणी म्हणाली, “दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू.”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरी दिली. दुसरी प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. “तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल.” तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” “गूळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक.” तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतली. तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, “मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकली नाही, ती दारिद्रयाने पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यानं नांदत आहे.” इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये.”

पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.” “कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहोळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनी भरून दिली. “बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा, म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं.” पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊं माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. “ठेवू नको, विसरू नको.” म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं. “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आईगं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं.” चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं.”

पाचव्या आदितवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं माखू घातलं, पाट बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. “काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अगं अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस, म्हणून तुला दारिद्र्य आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. प्रधानाची मुलं म्हणाली, “मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले.” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठली? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशी बघतात, तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तो कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटारे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” लाकूडतोड्या म्हणाला, “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिली. तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली, चित्त भावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हा वसा सांगितला.

पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वंयपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं.

आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाही, काही नाही” माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. “आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली, तीन माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आल. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वंयपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं.

आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाही, काही नाही.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐक.” ती म्हणाली, “कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता तो आला. डोहात बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वंयपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाही, काही नाही.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्ये होती. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवली, तीन मोत्ये आपण घेतली, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पाचव्या मुक्कामाला घरी आली. स्वंयपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, “अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. “काळं चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..