पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे उपक्रम प्रेरणेचे वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही आता मुला मुलींचे साहित्यिक म्हणून पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.
सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी. प्रत्येक माणसाकडून काहीतरी घेण्यासारखे असते काही जणांकडून काहीच घेण्यासारखे नसते हे सुद्धा आपल्याला विचार प्रवृत्त बनवते. एखाद्या आळशी दुःखी माणसाकडे पाहून आपल्याला वाटतं की आपण वेगळी वाट शोधायला हवी. प्रेरणा म्हणजे दुसऱ्याची झेरॉक्स कॉपी करायचे नसते तर ती एक ब्लू प्रिंट समोर ठेवून आपण आपली ब्लू प्रिंट बनवायचे असते.
लहान मुलाकडे पाहून आपल्याला प्रेरणाच मिळते म्हणून आपण म्हणतो लहान पण देगा देवा आपल्याला पुन्हा लहान मुलासारखं निरागस व्हावंसं वाटतं. प्रेरणेचे खत मिळाले की व्यक्तिमत्व बहरतंच. माणसे पोकळीत वाढत नाहीत माणसांना सहवास आवश्यक असतो तो हवाहवासा प्रेमाचा असेल तर केवळ आनंददायी नव्हे तर कर्तुत्वाकडे नेणारा तो हवाहवासा प्रवास असतो. असामान्य तर इतिहास घडवितात पण जेव्हा सामान्य सुद्धा इतिहास घडविता तेव्हा ती प्रेरणाच असते. अनेक व्यक्ती आणि त्यांचं कर्तृत्व उजेडात येतच नाही. पायवाट निर्माण करताना ती ठरवून करावी लागते. मनासमोर काहीतरी जिद्द ,संकल्प उद्दिष्ट असले की माणूस स्वतःला शिस्तीत गुंफतो आणि पायवाट तयार होते. भरकटणारे कधीच पायवाट निर्माण करत नाहीत.
पेरण्याच्या पायवाटा निर्माण करणाऱ्या मध्यें वय कधीच आड येत नाही. डी. गुकेश याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धिबळात विश्वविक्रम केला. कधी अनुवंशिकतेतून किंवा कधी कठोर परिश्रमातून प्रेरणेची पायवाट नकळत निर्माण होते. लहान मुले सुद्धा कोणाची ना कोणाची तरी प्रेरणा घेऊन स्वतः पायवाट निर्माण करतात. अशीच कहाणी आहे आराध्या राजीव नंदकर जिने अकराव्या वर्षी १४० पानाचे पुस्तक लिहून इतर जणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
आराध्या राजीव नंदकर वय ११ वर्ष या छोट्या लेखिकेच्या सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब या मोठया पुस्तकाने पुणे येथील पुस्तक महोत्सवात वाचकांचे लक्ष वेधले आहे. एकाच दिवशी तिच्या पुस्तकाच्या शंभर प्रति हातोहात खपल्या. आराध्या व इतर बाल साहित्यिक हे वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या सोशल मीडियाच्या जगात एक आशेचा किरण आहेत. अनेक लहान मुले तिचे पुस्तक उपलब्ध असलेल्या स्टॉलला भेट देत असून तिच्याशी संवाद साधून प्रेरणा घेतांना आढळून आली.मुलांची मोबाईल पासून सुटका करून घ्यायची असेल तर मुलांच्या हातात पालकांनी मोबाईलऐवजी आता पुस्तक दिले पाहिजे. मुले ही आपल्या देशाची भवितव्य असून पुस्तके ही त्यांच्यावर मूल्यसंस्कार रूजवण्याची मोठी माध्यमे आहेत.
आराध्या नंदकर ही पुस्तक वाचन सोबतच पेंटिंग आणि ट्रेकिंग करते. तसेच ती कराटे मध्येही ब्लॅक बेल्ट आहे. भविष्यात तिला लेखिका व्हायचे असून आपल्या देशाचे नाव साहित्य क्षेत्रात जगात मोठे करण्याचे तिचे ध्येय आहे.
अशीच कामगिरी साची भांड हिने ‘साचीच्या गोष्टी’ तसेच पालवी मालुंजकर या बाल साहित्यिकांनीही आपली पुस्तकें प्रकाशित केली आहेत. प्राची व पालवी यांचे आजोबा प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड असल्यामुळे पुस्तकांच्या सहवासातच या दोघींचा लेखन प्रवास सुरू झाला. आराध्या चे वडील राजीव नंदकर व तिची आई प्रोत्साहनामुळे ती लिहिते झाली.
पालवी ही ब्लॉग रायटर आहे. ‘सर्जक पालवी’ हे कोविडच्या काळात ब्लॉग लिहिले व तिचे पुस्तक प्रसिद्ध केले. पालवीच्या पुस्तकाप्रमाणेच अनेक मुलांच्या पुस्तकांची दखल प्रकाशक घेत आहेत. या सर्व बाल साहित्यिकांच्या पाऊल खुणा पुढे दुसऱ्यांसाठी पायवाट म्हणूनच राहणार आहेत.सोनाली गावडे हिने ‘माझी दैनंदिनी’ लिहायला सुरुवात केली ते शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचा पुरस्कार तिला मिळाला आहे. तिचं पुस्तक प्रकाशित झालें तेव्हा ती सातवीत होती.
मुलें वाचत नाहीत कसे म्हणता येईल? मुलें वाचत आहेत व लिहीतही आहेत. प्रोत्साहनाच्या जेवढ्या पायवाटा निर्माण करता येतील तेवढ्या आई-वडिलांनी, आजी आजोबांनी, पालकांनी व समाजातील घटकांनी निर्माण करायला हव्यात.
डॉ.अनिल कुलकर्णी
Leave a Reply