प्रेम धवन यांचे वडील ब्रिटीश सरकारच्या नोकरी मधे जेल सुपरिंटेंडेंट होते. पुढे मोठेपणी त्यांनी ला॑होरच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला जिथे त्यांचे वर्गमित्र होते साहीर लुधीयानवी. त्यांचा जन्म १३ जून १९२३ रोजी झाला. साहीर यांच्या बरोबरीने प्रेम धवन यांनीही वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला. अनेक देशभक्तीपर कविता त्या दोघांनी लिहील्या. ते दोघेही बरोबरीने कम्युनिस्ट पार्टीमधे सामील झाले. पुढे मुंबईला आल्यावर त्यांनी “ईप्टा” मधे प्रवेश केला. ईथे त्यांनी वेगवेगळी नाटके, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. काही काळ ते पं. रवीशंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतही शिकले. याचाच फायदा त्यांना पुढे “शहीद” आणि ईतर काही चित्रपटांना संगीत देताना झाला. पं. रवीशंकर यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचेही धडे घेतले. देशभक्तीपर गाणी लिहीताना प्रेम धवन यांच्या प्रतिभेस विशेष बहर येई. “छोडो कलकी बातें, कल की बात पुरानी” हे हम हिंदूस्थानी या चित्रपटातील गीत त्याचे आणखी एक उदाहरण. ऐ मेरे प्यारे वतन हे गाणे प्रेम धवन यांचेच साल १९६५ – निर्माता केवल कश्यप यांचे नाव पुढे करून मनोज कुमारने चित्रपट निर्मीती मधे उतरायचे ठरवले.
मनोज कुमारला या देशातल्या लोकांची मानसिकता अचुक पणे माहीती होती. त्यामुळे त्याने सरळ देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचे योजले. कथा निवडली शहीद भगतसिंग यांची. रामप्रसाद बिस्मील यांच्या काही मुळ रचना त्याने चित्रपटात वापरायच्या ठरवल्या. बाकी गाण्यांचा प्रश्न होता. गीतकार पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) हे मनोजकुमारचे खास मित्र. त्यांनीच मनोज कुमारला प्रेम धवन यांचे नाव सुचवले. चित्रपट प्रदर्शित झाला. मोहम्मद रफी यांच्या आवाजातले रामप्रसाद बिस्मील यांचे “सरफरोशी की तमन्ना” लोकप्रिय झालेच. पण त्याहून लोकप्रिय झाले – “ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम” आणि क्लायमॅक्सला असलेले “मेरा रंग दे बसंती चोला”. या चित्रपटाचे संगीतही प्रेम धवन यांचेच होते. दस लाख या चित्रपटातले “गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा”. या गीताचे गीतकारही प्रेम धवन हेच होते.
किशोर कुमार यांनी गायलेले पहिले गाणे – “मरनेंकी दुवाएं क्युं मांगू, जिने की तमन्ना कौन करे” हे प्रेम धवन यांनीच लिहीलं होतं. पण एवढे सगळे गुण असूनही, दर्जेदार काव्य रचूनही त्यांचे समकालीन शैलेंद्र, साहीर आणि हसरत जयपूरी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात ते अपयशी ठरले. संगीतकारांमधे खेमचंद प्रकाश (यांनी त्यांना पहीली संधी दिली), अनिल विश्वास, सलील चौधरी, चित्रगुप्त आणि रवी यांच्याशी त्यांचे विशेष जमायचे. त्यातही सर्वात जास्त (लोकप्रिय) गीते त्यांनी रवी यांच्या संगीतामधे दिली. काव्याबरोबरच नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती. काही चित्रपटगीतांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विशेष उल्लेख म्हणून नया दौर चित्रपटातील “उडें जब जब जुल्फे तेरी” चा उल्लेख करावा लागेल. या व्यतीरिक्त दो बिघा जमिन, धूल का फूल, गुंज उठी शहनाई, वक्त या आणि अशाच काही चित्रपटांचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. गीतकार म्हणून कारकिर्द चालू असताना काही चित्रपटांना संगीतसुध्दा दिले. मनोजकुमार यांचा शहीद, रात के अंधेरे मे, पवित्र पापी अश्या काही मोजक्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन मा.प्रेम धवन यांनी केले होते.
प्रेम धवन यांचे निधन ७ मे २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply