
कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
सध्या पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मूर्ती प्रसन्न असून लवकर भक्तांना पावणारी आहे. हे एक जागृत गणेशस्थान आहे.
प्रशस्त अशा जीर्णोद्धार केलेल्या मंदिरातील शेंदूरचर्चित मांडी घातलेली श्री गणेशाची मूर्ती पहाताक्षणी प्रेमात पडावी अशीच आहे. हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी मदत केली असून या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास आहे, हे मंदिर फिरल्यानंतर काही क्षणातच लक्षात येते. प्राचीन काळातील जुनी बांधणी असलेल्या या मंदिराचा गाभारा जास्त मोठा नाही. पण गाभाऱ्यामधील गणेशाची मूर्ती मात्र बऱ्यापैकी मोठी असल्याने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकाम करताना एका वीर पुरुषाच्या स्मारकाचे आणि सतीच्या स्मारकाचे अवशेष सापडले आहेत. या सर्व भग्न मूर्ती आजही मंदिराच्या आवारामध्ये पाहायला मिळतात.
कण्वमुनी भारताची यात्रा करताना या गावामध्ये आले. ते श्री गणेशाचे उपासक असल्याने उपासनेत खंड पडू नये यासाठी बाल दिगंबर गणेशमूर्तीची स्थापना केली.
अतिप्राचीन मंदिर असल्याने या बाल दिगंबर गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बाराही महिने लांबून भक्त येत असतात. या बाल गणेशाचे दर्शन घेऊनच मग अनेक भक्त पुढे भीमाशंकरच्या दर्शनाला जातात.
छान माहिती.