
जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी औरंगाबाद येथे झाला.
माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली.
पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं.
१० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी ‘सर्वोत्तम पर्विन फेलो’ हा सन्मान पटकावला. त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे १९९२ साली भारतभरात १२०० ठिकाणी साजरा झाला.
जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply