नवीन लेखन...

आर्यावर्तातील प्राणत्यागी विहंग 

अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .

आर्यावर्तातील कामरूप प्रदेशातील जतिंगा गावातील अवघड पहाडावर दोघेही मुद्दाम आले होते .

पहाड खूप जुना होता .
आजूबाजूला खोल दरी होती .
वारा वहात होता , तरीही सर्वत्र पडलेल्या मृत विहंगांची दुर्गंधी पसरली होती .

सारं अनाकलनीय , अविश्वसनीय , अतर्क्य असंच होतं .

गेल्या अनेक संवत्सरापासून हे घडत होतं .
प्रत्येक संवत्सरात विशिष्ट कालावधीत अनेक प्रदेशातील विहंग या पहाडावर यायचे . उंच झेप घ्यायचे आणि ठराविक उंचीवर गेल्यावर चोच भूमीच्या दिशेने वळवून पहाडावर अत्यंत वेगानं येऊन आदळायचे . प्राणत्याग करायचे .
सहस्रच्या संख्येनं . एकामागोमाग एक .
हे सगळं अनाकलनीय आणि अतर्क्य होतं .
वर्षानुवर्ष चालत आलेलं होतं .
अनेकांनी विहांगाना थांबवण्याचा यत्न केला . त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला . पण उलट्या घड्यावर पाणी पडावं , तसं होत होतं .

अजन्म्याला हे कळलं तेव्हापासून तो सुध्दा समजून घेण्याचा प्रयत्न करत होता .

एकदा तर त्यानं आदळणाऱ्या विहंगाला अलगद पकडलं .
त्यानं खूप धडपड केली सुटायची .
पण अजन्म्याची पकड घट्ट होती .
त्यानं विचारलं ;
” हे काय चाललंय तुम्हा सर्वांचं ? सर्वजण प्राणत्याग का करत आहात . हा पहाड धोकादायक आहे , हे कळत का नाही तुम्हाला ? वर्षानुवर्ष , पिढ्यानपिढ्या याच पहाडावर आत्मघात का करावासा वाटतो ? असं काय आहे यात की तुम्हाला आत्मघात करण्यापासून कुणी परावृत्त करत करत नाही ? पूर्वी कामरूपातील जतींगामधल्या या पहाडावर तुम्ही स्वेच्छेने प्राणत्याग करत होता . आता तर संपूर्ण आर्यावर्तच पहाड झाला आहे . काय झालंय तुम्हाला ? ”

” भगवंता , तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत . तरीही सांगतो . या पहाडाच आकर्षण कसं कुणास ठाऊक पण आहे . आमच्या पूर्वजांची एक धारणा होती की या पहाडावर प्राणत्याग केला की स्वातंत्र्य मिळतं . खरं की खोटं माहीत नाही , पण ही धारणा होती . हा पहाड आमची रोजची भूक भागवेल असं सांगितलं जात होतं . सर्वांना विनामूल्य घरटी , आमच्या पिलांना जे जे गरजेचं आहे ते विनामूल्य देण्याची योजना , प्रकाशाची विनामूल्य व्यवस्था , आकाशात उडण्यासाठी पंखात विनामूल्य बळ असं बरंच काही पहाड देईल असं वाटत राहतं . असंख्य वर्षे गेली , पण यातलं काही मिळालं नाही . तरीही पहाडाच आकर्षण आहे . आमच्या अनेक पिढ्यांनी प्राण त्यागून या पहाडाला बळ पुरवलं आहे . या पहाडावर उपकार केले आहेत , ते त्याने विसरू नयेत म्हणून आम्ही प्राणत्याग करतो .”

विहंग अजन्म्याच्या हातातून निसटून आकाशात झेपावला आणि तितक्याच वेगाने येऊन प्राणत्याग केला .

— अजन्म्याला सगळं आठवलं .
त्यानं सुदाम्याला सगळं सांगितलं .

” मित्रा कृष्णा , पहाड गेली अनेक संवत्सरं खोटं बोलतोय , विहंगांच्या रक्तानं पुष्ट होतोय , हे विहंग मान्य करत नाही , हे खरं आहे , पण त्यांना वाचवायला अन्य कुणी सुजलाम् सुफलाम् पहाड निर्माण का होत नाही ? ”

सुदामा विचारता झाला आणि अचानक अजन्म्याचे डोळे चमकले .
इतक्या वर्षांनी एक गोष्ट त्याच्या ध्यानी आली . त्यानं सुदाम्याचा हात हाती घेतला .

” मत्प्रिय सुदाम्या , आज तू माझे डोळे उघडले आहेस . आत्ता माझ्या लक्षात येत आहे की गेली अकरा संवत्सरे प्राणत्याग करणाऱ्या विहांगांची संख्या खूप कमी कमी होत चालली आहे . याचाच अर्थ दुसरा चांगला , सर्वोत्तम पहाड निर्माण झाला आहे . चल , आज आपण त्याचेच दर्शन घेऊ .”

अजन्मा उठला आणि सुदाम्याचा हात हाती घेऊन पहाड उतरू लागला .

पूर्व दिशेला उगवणारा दिनमणी आज त्याला नवाच वाटू लागला होता …

( काल्पनिक )

— डॉ श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 117 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..