३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स … आनंदाने आपापल्या घरी गेलो … !!
लगेच त्याचं BROUCHURE छापून सगळ्या जगभरातल्या मराठी माणसांना सांगूया कि असा असा एक कार्यक्रम सुरु झाला आहे , असं काहीही मनातच आलं नाही . आपली गाणी , कविता लोकांना आवडल्या आणि आपल्यालाही मजा आली एवढाच काय तो निष्कर्ष . त्यात तेव्हा कॉलेजकुमार असलेला आदित्य आठल्ये तबल्यावर , नितीन चंद्रचूड ह्यांचा साऊंड आणि मी आणि संदीप , असे एकूण चार जण , एवढी मोठी टीम!!:)
जवळजवळ महिनाभराने संदीपशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अजून एकदा करूया का रे ? मजा आली होती त्या दिवशी , बघूया आले तर आले लोक, नाहीतर आपण काँट्रीब्युशन काढून करू एक प्रयोग” असं बोलणं झालं, पुन्हा हाउसफुल्ल !!
मग तिसरा … मग चौथा …तुम्ही दाद देत राहिलात आणि आम्ही गात राहिलो .
मग पुण्याबाहेर पहिला, कोल्हापूर मग सांगली … मुंबईचा एक संगीतकार मला जळक्या ( ज्याला मुंबईत पुणेरी म्हणतात ) टोन मध्ये म्हणाला होता , हा कार्यक्रम पुण्यात वर्ल्ड फेमस आहे ना ? मी हसलो होतो …
१७ देशात कार्यक्रम झाले अगदी ,अमेरिकेत ४० हुन अधिक शहरात हाऊसफुल …. भारतात अनेक शहरात … महाराष्ट्रात अगदी छोट्या गावांपासून ते शुक्रवार, शनिवार रविवार. ठाणे, दादर, पार्ले असे हाउसफुल्ल कार्यक्रम …कोकण ,विदर्भ , मराठवाडा , नाशिक, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बंगलोर, बडोदा, दिल्ली, इंदोर,भोपाळ … सगळीकडे तेच प्रेम,तोच उत्साह
शंभर शंभर वेळा आयुष्यवर बोलू काही बघणारे अनेक रसिक आहेत .आम्ही शब्द विसरलो तर गाणं पूर्ण करतील असे अनेक मित्र जोडले गेले. संपूर्ण थिएटर आमच्याबरोबर गातांना ऐकण्याचा योग वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आहे .
१०० वा … मग झी मराठीवर प्रक्षेपित झालेला ५०० वा … मग … १००० … ११११… आणि आता १४०० च्या जवळ आलेली प्रयोगांची संख्या …
मधल्या काळात अत्यंत गुणी गिटार वादक, रितेश ओहोळ या कुटुंबात सहभागी झाला आणि आता कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाला. अजूनही तबल्याला आदित्य आठल्ये आणि साऊंड नितीन चंद्रचूड ह्यांचाच आहे , कॉलेजकुमार आदित्य आता `बाबा ` झाला आहे
शुभंकरला कडेवर घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो तो दिवस आठवतो, आणि आता शुभंकर अनेक कार्यक्रमात गायला. त्याच्या गाण्याच्या फर्माईशी मला येतात , एकटी एकटी घाबरलीस ना, करून करून काळजी माझी गायलाच हवं असं रसिक म्हणतात . एक मोठा प्रवास ! १८ वर्ष !!
सातत्याने नवीन गाणी, कविता … अगदी … दिवस असे कि, हे भलते अवघड असते, अताशा असे हे , नामंजूर … सांग सख्या रे .. पाऊस असा रुणझुणता, मोर्चा नेला नाही, मेघ नसता वीज नसता, तुझे नि माझे नाते काय ? … इथपासून दिवा लागू दे रे देवा आणि संदीपच्या अनेक नवनवीन कविता ,अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ` मी आणि माझा आवाज ` ह्या पुस्तकातील कविता आणि आम्ही नुकतंच केलेलं , रुक जा जालीम आखरी बार पर्यन्त … अग्गोबाई पासून दूर देशी गेला बाबा पर्यन्त आणि दमलेल्या बाबा पासून ऐसे काही व्हावे मन शांत निजावे … प्रत्येक रचनेला तुम्ही आशीर्वाद दिला.
खूप रसिक, संयोजक, वाहन चालक, ध्वनिसंयोजक , सगळ्यांचे हात मनापासून ह्यात सहभागी झाले म्हणून हा प्रवास इतका सहज सुंदर झाला .
अजूनही ह्या कार्यक्रमाचं BROUCHURE नाहीये . कोणी AGENCY नाही. कार्यक्रम तुम्ही रसिकांनी मोठा केला … तो तुमचा होता आणि तुमचाच राहील .
– सलील कुलकर्णी.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply