पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी हुमरस अण्हेरी, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला.
आत्माराम सावंत यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे लहानपणापासून कीर्तनाची व गणपतीत होणार्या मेळ्यांची आवड होती. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांनी आत्माराम यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन नोकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. १९५३ ते १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली.१९६० ते १९७० या काळात सावंत दैनिक नवाकाळ आणि दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी आपले अनुभवांवर बेतून शब्दबद्ध केलेली ’चौथा अंक’ आणि खुर्चीचा खेळ’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. नवशक्ती, नवाकाळ, मराठा आणि मुंबई सकाळ या विविध वृत्तपत्रांत आत्माराम सावंत यांनी उपसंपादक, सहसंपादक मुख्य संपादक आदी विविध पदांवर काम केले आहे, आणि ते करताना बरेच स्फुट लेखन केले. १९७० मध्ये आत्माराम सावंत परत रंगभूमीकडे वळले. याच काळात त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेल चुलीत–वरचा मजला रिकामा हि त्यांची नाटके खुप गाजली. १९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते.
त्यांची इतर नाटके.
आगपेटीतील राक्षस (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९७७)
आई म्हणोनी कोणी (व्यावसायिक नाटक)
जन्माची गाठ (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
ताठ मानेचा माणूस (व्यावसायिक?)
तेथे पाहिजे जातीचे (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
दरोडा (व्यावसायिक नाटक)
माझं कुंकू (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
मुजरा घ्या सरकार (व्यावसायिक नाटक)
मुलगी (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
सत्तेवरचे शहाणे (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९८८)
सासरेबुवा जरा जपून (व्यावसायिक नाटक)
सूनबाई (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
आत्माराम सावंत यांचे ४ मार्च १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply