नवीन लेखन...

शुक्रवारची कहाणी

(पैशापेक्षा मनाची श्रीमंती मोठी हा संदेश देणारी गोष्ट )

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं.” असं सांगितलं. ही घरी आली. देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत; पोटभर जेवत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही. सोवळं नेसली. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं; तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, “ताई, ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागिना नाही; तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीच, आता उद्या काही येऊ नकोस!” असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली.

दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, ‘आई, आई, मामाकडे जेवायला चल!’ बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे, तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, “ताई, ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल!” तिने ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावाने पाहिलं. हात धरून घालवून दिली. फार दु:खी झाली. देवाची प्रार्थना केली.सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.

असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळला. बहिणीला म्हणू लागला, “ताई, ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको. उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही!” बहिणीनं “बरं’ म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली, दागदागिने ल्यायली. उंची पैठणी नेसली. आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पहातच होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली की, शालजोडीने उकडत असेल, म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाटी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढीत असेल.

नंतर ताईने भात कालवला. मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला.

भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली. भावाने विचारलं, “ताई, ताई, हे काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे.” भावाला काही समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, “अगं ताई, तू आता जेव तरी”.

तिनं सांगितलं, “बाबा, हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवली.” इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघं जेवली. मनातली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हाला करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.

[“सुबोध वाचन’, पुस्तक ६ वे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ३-५]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..