सुरु होते सुरळीत । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।
आला अदृश्य विषाणू । माजविला हाहाःकार ।। १ ।।
किती उपाय योजिले । दूर ठेवण्यासि त्यास ।
रोज डांबून ठेविले । घरी सकळ जनांस ।। २ ।।
हात सतत धुतले । पाणी प्यायले कोमट ।
तरी सरता सरेना । विचारांचे जळमट ।। ३ ।।
नको कसलाच धोका । सारे झालो भावनिक ।
रिचविला काढा ,गोळ्या । भरीस अर्सेनिक ।। ४ ।।
एकैक ऐकोनि अनुभव । गेली मने हेलावून ।
निद्रादेवी ही रात्रीस । आता हसे वेडावून ।। ५ ।।
सारे आकडे पाहता । साऱ्या लाखाच्याच गोष्टी ।
सारी प्रजा अन राजाही । जाहले दुःखी कष्टी ।। ६ ।।
नको नको रे माणसा । असा उतावीळ होवू ।
तीन मासाचे प्रयत्न । नको धुळीस मिळवू ।। ७ ।।
सर्वा कळून चुकले । त्वरित सोडेना हा पाठ ।
त्याच्या सोबत जगणे । बांध आता स्मरण गाठ ।। ८ ।।
नको नकोसे वाटले । परि यात आहे तथ्य ।
आता पाळायाच हवी । काही सामाजिक पथ्य ।। ९ ।।
घराबाहेर पडता । सदा मुख-नाक झाक
तेथे दिसता सवंगडी । मार दुरूनच हाक ।। १० ।।
तरी समीप ते येता । घाल स्वतःवरी बंधन ।
नको हस्तस्पर्श आलिंगन । केवळ हाताने वंदन ।। ११ ।।
द्रव्य खर्चण्या आधी । कोष्टक मांड तू त्रिवार ।
मुख्य गरजा सांभाळ । नको चैनीचा विचार ।। १२ ।।
जरी नैराश्य भवताली । ठेव उल्हासित चित्त ।
परिस्थिती सुधारण्या । तू व्हावेस निमित्त ।। १३ ।।
शासकांच्या हाती असे । केवळ सुविधांचा दर्जा ।
परि तुझ्या जीविताची मात्र । तूच आहेस उर्जा ।। १४ ।।
काळ जरी हा कठीण । अटळ आहे त्याची हार ।
काळ हेच असे औषध । तोच नेईल अटकेपार ।। १५ ।।
सर्वकाही करू आता । जगण्याच्या आसक्तीने ।
पिटाळून लावू त्यास । शक्ती-युक्ती-भक्तीने ।। १६ ।।
पण एकट्याचे कर्म नव्हे । हवे सर्वांचेच दायित्व ।
अन्यथा अशक्य आहे । त्यावर मिळविणे प्रभुत्व ।। १७ ।।
अदृश्य शत्रूच्या चालीचं ।आता अवघं गणित मांडलं ।
संशोधनाचे फळ मिळता । घालोनि कवच कुंडलं ।। १८ ।।
सर्व मिळून निश्चित । वाचवू एक एक श्वास ।
दिवस येतील सुगीचे । दृढ आहे हा विश्वास ।। १९ ।।
आशेच्या या किरणांनी । नष्ट करू अंधःकार ।
पुन्हा सुरळीत करू । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।। २० ।।
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply